अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान; पुणे-कोल्हापूर मार्गालाही तडाखा
मुंबई : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात बुधवारी गारपीटासह अवकाळी सरी बरसल्या. त्यामुळे ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव परिसरात ऐन कापणीच्या तोंडाशी आलेले पीक आडवे पडल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गुरुवारी गुढी पाडव्याच्या सणाआधीच शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या अपेक्षेने घेतलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीचा आढावा स्थानिक पातळीवर घेतला जात असून, मदतीची मागणी होत आहे.
विधानभवन येथे धाराशिवचे आमदार कैलास पाटील व उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी यांनी बुधवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. त्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटीमुळे झालेल्या शेती नुकसानाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. पुणे-कोल्हापूर महामार्गासह आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. डिंभे धरण परिसरात दुपारनंतर वातावरणात गारवा निर्माण होत पावसाला सुरुवात झाली. मागील दोन दिवसांपासून उकाडा वाढला होता. सध्या हलक्या सरी कोसळत असल्या तरी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे विशेषतः आदिवासी भागातील शेतकरी चिंतेत असून, पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कर्जमुक्तीच्या घोषणेनंतरही वसुलीचा तगादा! पुसद, महागावमध्ये कर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस
धाराशिवमध्ये द्राक्ष, केळी, आंब्याचे नुकसान
मंगळवारी धाराशिव-उमरगा-लोहारा मतदारसंघात दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. द्राक्ष, केळी, आंबा तसेच विविध फळबागांसह कांदा, हरभरा, गहू, ज्वारी यांसारख्या पिकांचे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. विशेषतः गारपीटीमुळे अनेक ठिकाणी उभी पिके जमिनीवर आडवी पडली असून, हातातोंडाशी आलेले पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरकारकडून दखल
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वीच नुकसानभरपाईची अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी आढावा बैठकीत सांगितले.
हेदेखील वाचा : Kolhapur News : इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका; कोल्हापुरात गॅस दरवाढीमुळे रिक्षाचालकांना संताप






